अनवली (वार्ताहर) :- पंढरपूर डाक विभाग नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांना वेळोवेळी सुविधा देत आला आहे.कोरोना काळात ही पंढरपूर डाक विभागाने अव्वल कामगिरी करत ग्रामीण भागात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून रोख रक्कम आणि पोस्टा मार्फत औषधे वेळोवेळी पोहचवली आहेत.
अनवली ता. पंढरपूर येथे भारतीय डाक विभागांच्या वतीने आज आधार शिबिर आयोजित केले होते. त्याचा नागरिकांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येते. नवीन आधार कार्ड काढणे, अनेक वर्षांचे जुने आधार कार्ड नूतनीकरण करणे या प्रक्रियेपासून ग्रामीण भागातील जनता पूर्णपणे मागे आहे. आधार कार्ड पूर्णपणे अद्यावत नसण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. नवीन आधार कार्ड , तसेच मुलांचे वय वर्षे ५ व १५ झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक (हाताचे ठसे) बदलणे, फोटो बदलणे गरजेचे असते, याची माहितीही ग्रामीण भागातील काही नागरिकांना नाही.
या आधार शिबिरासाठी पंढरपूर डाक विभागाचे श्री. विष्णू कांदे, सुधीर इंगळे,आदिनाथ कुंभार उपस्थित होते.यासाठी पंढरपूर डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक राजकुमार घायाळ व अधीक्षक एन. रमेश यांचं मार्गदर्शन लाभले. अनवली गावाच्या अंगणवाडी सेविका व आशा यांचे सहकार्य लाभले.
एखाद्या कामासाठी गरज लागत नाही, तोपर्यंत नागरिकांना आधार कार्डाचे महत्त्व कळत नाही.गरज लागल्यानंतर त्यांची धावपळ सुरू हाेेते. त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टीचा अधिक खर्च होतो. आज आनेक ठिकाणी नागरी सेवा केंद्र आहेत. मात्र, त्याच्याकडून याबाबत जनजागृती होताना दिसत नाही. सध्या ५० रु. ते १०० रु.मध्ये ही दुरुस्ती होत आहे.
ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, समाजसेवक यांनी पूर्व नियोजन करून, अशा प्रकारचे शिबिर डाक विभागाच्या साह्याने आयोजित केले, तर नक्कीच नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
إرسال تعليق