“… हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा अवमान”; शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

 

मुंबईच्या वाटेला वाद हे पाचवीलाच पुजलेले, शिवसेनेची टीका

संग्रहित (पीटीआय)

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेचा सुरू असलेला वाद अद्यापगी शमलेला नाही. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान आहे, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते, असं म्हणत शिवसेनेनं यावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये.

मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान! डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्टय़ा मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.

बॉलीवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीत, संगीतात नशीब अजमावयास येणारे आधी फुटपाथवर पथारी पसरतात. पण नशिबाचा तारा एकदा चमकला की, याच मुंबईच्या जुहू, मलबार हिल, पाली हिल भागात आपले इमले उभे करतात. पण एक नक्की, हे सगळे लोक सदैव मुंबई-महाराष्ट्राशी कृतज्ञच राहिले. मुंबईच्या मातीशी त्यांनी कधी बेइमानी केली नाही. दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’पर्यंतचे किताब मिळाले.

महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईची भूमी येथील भूमिपुत्रांच्या रक्ताने आणि घामाने भिजली आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे!

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article